Pages

October 30, 2012

बुढ़ापे को दुआ दो !!

म्हातार्‍यानी अमच्या वेळी असं म्हणून (भूतकाळातील काल्पनिक आणि त्याच त्याच) गोष्टी उगाळत बसायचं नाही. वर्तमानातील तक्रारींचा पाढा वाचत बसायचं नाही. आपला आवडता छंद जोपासायचा. नसेल तर लावून घ्यायचा. आपल्याच विषयी बोलायचं नाही; नव्या गोष्टीत रस घ्यायला शिकायचं. म्हातारी माणसं नकोशी होतात कारण ती फक्त स्वत:च्याच कोषात असतात.
  
--------------------------------------------------------------------

गेले काही दिवस मी भयंकर अस्वथ आहे. चित्त थारयावर नाही. कारणही तसं क्षुल्लकच आहे. म्हणजे झालं काय, आमच्या शेजारच्या एका कार्ट्यान मला चक्क 'आजोबा' म्हणून हाक मारली. त्याचाच मोठा भाऊ मला काका म्हणतो. छान संस्कृत पोर आहे हो! आणि हे कार्ट.....ती हाक मारल्या पासून मन कसं सैरभैर तर झालंय. सी. डी. वर पाहिलेल्या 'सं. शारदा' नाटकातलं गाणं आठव आठवतं-
म्हातारा इतुका न, अवघे पाउणशे वयमान,
दन्ताजींचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान....

यातली पहिली ओळ खरी असेल पण बाकीचे सारे....त्या नंतर काही दिवसांत आरशात डोकावण्याचे प्रमाण वाढतेय. बायकांच्या खवचट स्वभावाप्रमाणे आमच्या हायकमांडने एक गुगली टाकता- ‘आता नव्याने केस उगवातायेत कि काय ’ असं म्हणतात –‘अप्रियस्यच पध्यस्य’ अप्रिय गोष्टी पथ्याप्रमाणे वर्ज्य कराव्यात. आम्हीही तेच (दुर्लक्ष) केले. (दुसरे करणार तरी काय म्हणा!)
मन एकीकडे आपण म्हातारं झाल्याची टोचणी लावून गाणे म्हणत होतं- आईना मुझसे मेरी पहली सी सरत मांगे..आता वृद्धाश्रमाचा शोध...तुम्ही म्हणाल वृद्धाश्रम? तो कशाला? चांगलं आपल्या माणसात रहायचं सोडून ही काय अवदसा आठवली तुम्हाला? त्याचं काय आहे शहाणा माणूस भविष्याचा विचार आणि तरतूद आधीच करत असतो. साठीला निवृत्ती घेतल्यावर मला वाटले आपण एखादा चांगला वृद्धश्रम पाहून ठेवावा. हल्ली सगळीकडेच गर्दी वाढलीय. आरक्षणाशिवाय प्रवेश नाही. नंतर धावपळ व मनस्ताप नको.
       आणि वृद्धाश्रम अशासाठी कि समवयस्कांमध्ये राहता येईल. एकमेकांचे अनुभव वाटून घेवून आपलं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करता येईल. कधी परस्परांच्या संगतीत वसंतराव देशपांड्यांचा मारवा, भीमसेनांचा मल्हार, प्रभा अत्रेचा मारू बिहाग, ऐकता येईल. किंवा गेला बाजार निदान लताची भुरळ घालणारी बरसात, बैजू बावरा युगातली गाणी, तलतचा मखमली स्वर, हेमंत कुमारचा भरीव खर्ज आणि रफीचा लवचिक स्वर ऐकत संध्याकाळ कारणी लावता येईल. अशा अनेक कल्पनांनी मन फुलारलं होतं.
       खरंच त्यावेळी काही वृद्धश्रम पहिले. पहिल्या ठिकाणी मला दोन आश्रमांच्या पाट्या दिसल्या एक होती मातोश्री वृद्धाश्रम आणि दुसरी पिताश्री अनाथाश्रम. वा!! काय अचूक नाव !! मनानं हळूच म्हटलं म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण. त्यांना सांभाळायला आईच हवी. यासाठी वृद्धाश्रम आईच्या नावे असावा आणि असा अनाथाश्रम काढण्याला कारणीभूत बेजबाबदार पिताजीच ना? त्यामुळे पिताश्री अनाथाश्रम.
       आम्ही आश्रमात पाऊल टाकले तो तिथले उदास, शांत आणि चमत्कारिक वातावरण अंगावर आले. सर्व आश्रमात फेरफटका मारून आम्ही काय पहिले? अत्यंत खिन्न, जगण्याचे ओझे झाल्याचे भाव, सर्वांगी वागवत असलेली माणसे, बोलण्यात तक्रारीचे सूर किंवा आपल्या जुन्या असल्या नसल्या (बहुधा नसल्या) कर्तबगारीचे (अनेकदा सांगितलेले आणि अवास्तव) वर्णन. काही लोक केवळ वेळ जाण्यासाठी जीवावर येऊन खेळत असलेले पत्ते, कॅरम वगैरे बैठे खेळ हेच चित्र दिसले. कुणाचा कशातच जीव नव्हता. त्यांच्या हालचाली एवढीच त्यांच्या जिवंतपणाची खूण. बाकी सारे वातावरण सुद्धा मरगळलेले.
       आणखी एक दोन ठिकाणी सुद्धा तेच पाहिल्यावर आमच्या मानाने ठाव सोडला. आम्ही चित्रपटात (संदर्भ-तू तिथे मी, बेबीज दे आऊट वगैरे..) पाहून तयार केलेले मानस चित्र अकराव्या मजल्याच्या खिडकीची काच खालच्या कोन्क्रीट जमिनीवर पडल्यासारखे फुटले.
एवढ्यात माझ्याच मनाने पलटी खाल्ली आणि मानाने एक शेर ऐकवला.
बुढ़ापे को दुआ दे दो, जो किस्मत से मिलता है
अरेs अंगूर का किशमिश बडी मुद्दत से होता है

       अरेच्या खरंच की!! द्रक्ष्याचा बेदाणा व्हायला वेळ लागतो, कष्ट लागतात अनुभवाचे उन्हे आणि दुख:च्या गंधकाची धुरी खावी लागते. पण बेदाण्या मानुकांची चव ताज्या द्राक्ष्यापेक्षा कणभरही उणी नसते आणि ती अधिक स्वास्थ्यकरही असतात.
       छे! काय हा वेडेपणा? म्हातारपण कंटाळवाणं नसतं- ते आपण कंटाळवाणं करतो. म्हतारपण नकोसं असतं का? जे माणसाला स्वत:ला नकोसं वाटतं ते इतरांना हवंसं का वाटावं?
       आणि पटकन मला आमच्या एका मित्राची आठवण झाली. ण्णा म्हणतो आम्ही त्यांना. निवृत्ती आधी संसारिक व्यापातून जराशी मोकळीक मिळण्याचं वय झालं आणि त्यांनी आपली हौस म्हणून भावगीत वर्गाला जायला सुरुवात केली. मुळ चांगले चित्रकार, निवृत्त प्राचार्य पण निवृत्तीनंतर लहानसा अर्धांगाचा झटका आला. गुरु म्हणाले आता कसे भावगीत गाणार?
       कोणतही आव्हान स्वीकारायची जिद्द आणि रग त्यांच्याकडे भरपूर आहे. मागे एक शिंप्याने कपडे शिवणे म्हणजे पोरे हाकणे नव्हे म्हटल्यापासून स्वत: शिकून कपड्याबाबत स्वावलंबी झाले.
       गायनमास्तरांना काही न बोलता क्लास सोडून दुसरा शास्त्रीय संगीताचा वर्ग धरला आणि गेली दोन तीन वर्षे चालू आहे. चांगली प्रगती आहे.
       सारा भारत, शिंगापूर पासून मोरीशस पर्यंतचे शेजारी देश पाहून झाले तरीपण फिरण्याची हौस तिळमात्र उणावली नाही. त्याशिवाय अंध संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, बालमित्रांचा संघ वैरेंची कामे असतातच.
       स्वयंपकातही प्रगती आहे. लोणची न् चटण्या तर पोटातच नव्हे काळजात उतरतात. पोरात पोर आणि थोरात थोर होणारा हा माणूस एकवार जवळीकित आला कि थेट मनात घर करतो. त्यांच्यासारखं सफल आणि सुफल म्हतारपण करायचं तर काही पथ्ये पाळायला हवीत.
      
’आमच्या वेळी’ असं म्हणून भूतकाळातील काल्पनिक (आणि त्याच त्याच) गोष्टी उगाळत बसायचं नाही. वर्तमनातील ताक्रारींचा पाढा वाचत बसायचं नाही. आपला आवडता छंद जोपायसाचा. नसेल तर लाऊन घ्यायचा. आपल्याच विषयी बोलायचं नाही. नव्या गोष्टीत रस घ्यायला शिकायचं.
       म्हातारी माणसं नकोशी होतात कारण ती फक्त स्वत:च्याच कोषात असतात. भूतकाळातल्या आठवणी (बहुधा खोट्या) परत परत सांगून अगदी पिडतात. घुबड म्हणे दगड मारल्यावर चोचीत पकडते. तो दुसऱ्या दगडावर घासत राहते. तसे आपल्याविषयी तेच ते बोलून ही मंडळी आपल्या विषयीचा आदर आणि आपुलकी झिजवून पार खल्लास करतात.
या विचाराबरोबर मानाने डंक मारला.
होss ना, मग तू आता त्या अम्बेवाल्या म्हाताऱ्यासारखे वाग. मला आंबेवाल्याची कथा आठवली. एक नि:पुत्रिक म्हातारा नेहेमी झाडे लावत असे. आंब्याची अनेक झाडे त्याने लावली होती. एकदा तिकडून जाणाऱ्या राजाने ते पहिले. आणि थांबून त्याला विचारले ‘बाबा, ही आता लावलेली झाडे मोठी होऊन त्याला आंबे येणार केंव्हा? आणि तुम्ही खाणार केंव्हा? पुढचे कोण आहे तुतुमचं?
म्हतारा म्हणाला ‘बाबा रे, मी नसेन पण हे जाग तर असेल, माणसे असतील, कुणीतरी लावलेल्या झाडांची फळे, सावली वगैरेचा फायदा मी घेतलाच ना?’

गोष्ट आठवली आणि मनातली मरगळ पळाली. ठरवलं अभिषेकींनी गायलेल्या अभंगासारखं जगायचं.
नाही पुन्ण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गांगौगाचे पाणी
अवला नसून मोरावळा आहोत आपण!! आजच्या प्रदुषण आणि धकाधकीच्या आयुष्यात म्हातारं होणं सोप का आहे?

9 comments:

  1. Ujjwala Narendra AgasheOctober 30, 2012 at 10:47 PM

    शरद जी ..अप्रतिम :)

    ReplyDelete
  2. खुप सुन्दर लिहिले आहे तुम्हि शरद काका.............तुमच्या सरखा सगळ्यानि विच्यार केला तर घरातिल प्रत्येकज़ण आनन्दि राहिल........

    ReplyDelete
  3. Hare KrSNA ....Great Thought and work .....Thanks for the tag ....

    ReplyDelete
  4. Madhusoodan DeshpandeOctober 30, 2012 at 10:49 PM

    म्हातारपणाच्या जाणीवेचा विचार का करता. म्हातारं होतं ते शरीर. मन कधीच म्हातारं होत नाही. मीही ज्येष्ठ नागरिक आहे. कर्म करीत रहा. म्हातारपणाच्या जाणीवेचा विचार करण्यात उरलेले बहुमोल आयुष्य वाया घालवू नका. म्हणजेच आयुष्याचं सोनं होईल. असं मला वाटतं.

    ReplyDelete
  5. अप्रतिम ..अशीच विचारसरणी जर सगळे अवलंबतील तर प्रत्येक घर एक आनंदवास्तु होईल .....धन्यवाद ...

    ReplyDelete
  6. मैने भगवान से माँगी शक्ति ।
    उसने मझे दी कठिनाईयाँ हिम्मत बढाने के लिए ।
    मैने भगवान से माँगी बुध्दि ।
    उसने मुझे दी उलझने सुलझाने के लिए ।
    मैने भगवान से माँगी हिम्मत ।
    उसने मुझे दी परेशानीयाँ ऊपर उठने के लिए ।
    मैने भगवान से माँगा वरदान ।
    उसने मुझे दिये अवसर उन्हे प्राप्त करने के लिए ।

    ReplyDelete
  7. Vasant Chintaman JoshiNovember 1, 2012 at 4:32 PM

    मनाने चिरतरुण राहिल्यास म्हातारपण कधीच त्रासदायक वाटत नाही. चिरतरुण म्हणजे बदलत्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेणे त्याबद्दल तक्रार न करणे आणि दुसर्यावर उठसुठ टीका न करणे.

    ReplyDelete